वादविवाद आणि मन

वाद का होतात आणि मने का दुखावतात याबद्दल अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशन मार्फत चर्चासत्र आयोजित करण्यात आले. Covid च्या अगोदर आणि नंतरची स्थिती हा मुद्दा महत्वाचा होता. वादविवाद तर वाढलेच परंतु त्याचबरोबर एकमेकांना सांभाळून घेण्यात सुद्धा समाज जागरूक आहे हेही लक्षात आलं. त्यानंतर चर्चासत्र, व्यक्तीचा स्वभाव कसा याला कारणीभूत असतो याकडे जास्त झुकले.

सर्वप्रथम एक लक्षात घ्यावं लागतं की वाद घालणारी व्यक्ती तसेच ज्यांना असे वाटते की आम्ही मनाने दुरावलो आहोत, अशा व्यक्ती मानसिक तसेच वैचारिक दृष्ट्या परिपक्व नसतात. हीच परिस्थिती भारतात सुद्धा आहे.

प्रामुख्याने समाजात दोन प्रकारचे व्यक्ती कार्य करतात, मानसिक सक्षम तर दुसरा सामान्य (मानसिक दुर्बल). मानसिक सक्षम व्यक्तींचे तथ्ये पाहूया.

१. या व्यक्ती वाद न घालता चर्चेवर भर देतात व नवीन मार्ग शोधतात.

२. सक्षम व्यक्तींचा विचारांना विरोध असतो पण ते व्यक्तींच्या विरोधात नसतात.

३. ते प्रत्येकाला आपल्या चुका सुधारण्याची संधी देतात म्हणून हे मनाने कधीच दुरावत नाहीत.

४. या व्यक्ती स्वाभिमानी असतात, लाचारीने जगणे त्यांना मान्य नसते, आपल्या कार्यात व्यस्त असतात. प्रामाणिकपणे काम करतात.

५. केव्हा? कुठे? कुणाशी? कसे? काय? बोलावे याबद्दल ते सतर्क असतात.

६. या व्यक्ती सामान्यांना समजून घेऊ शकतात. ते असे का वागतात याची त्यांना जाणीव असते.

७. त्यांनी कुठले सहकार्य केले ते कधीही कोणाला बोलून दाखवत नाहीत.

याविरुद्ध सामान्य माणसाच्या दृष्टीने स्पष्ट विषयाशी सुसंगत कमी पण महत्वाचे तेच बोलणारे नागरिक हे अहंकारी असतात. त्यांच्या मते जे बडबड करतात त्या व्यक्ती मनाने मोकळ्या असतात असा त्यांचा गोड गैरसमज असतो. तसेच हे स्वतः ‘मी’पणा व अहमचे बळी ठरलेले असतात परंतु ते सतत इतरांना दोष देतात.

यातून अजून एक मुद्दा महत्वाचा, सहकार्य व उपकाराचा. सहकार्य घेताना आपण कोणाकडून सहकार्य घेत आहोत याचा विचार करावा. कारण काही कालावधीनंतर मदत घेणाऱ्या व्यक्तींसोबत वैचारिक मतभेद निर्माण झाल्यास समोरची व्यक्ती त्यांनी आपल्यावर कशा प्रकारे उपकार केले ते ऐकवतो.

मग अशा वेळी सामान्य व्यक्तींनी काय करणे अपेक्षित आहे, ज्यानेकरून त्यांची सुधारणा होऊ शकते?

१. मानसिक परिपक्वता लक्षात घेऊन आपले कौशल्य विकसित करायला हवे.

२. समोरील व्यक्ती अथवा पाल्य असा का वागतो याचा विचार करावा.

३. आपल्या अपेक्षा नुसारच इतरांनी वागावे किंवा सूचनांचे पालन करावे हा अतिरेकी हाव टाळावा.

४. कोणतेही काम करण्याची प्रत्येकाची विशिष्ट अशी पद्धत असते हे लक्षात घ्यायला हवे.

५. प्रत्येकाचे विचार, कार्य करण्याची व जीवन जगण्याची पद्धती भिन्न असते हे ध्यानात ठेवावे.

६. वादविवादाची पद्धत बदला.

७. गैरसमज, विचार करण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन, चुकीचे निष्कर्ष, अर्थ काढणे, वैचारिक उंचीची असमानता यामुळे वाद होत असतात ते टाळणे महत्त्वाचे.

८. प्रसंगी मानसोपचरतज्ज्ञ यांना भेटून योग्य समुदेशन करून घ्यावे.

वादाचे मूळ हे अनेकदा आपल्या वाईट सवयी मध्ये असते. अनेक व्यक्ती वारंवार असत्याचा आधार घेतात, कोणतीही गोष्ट सांगतात व अशा वाईट सवयींमुळे इतरांचा विश्वास गमावतात. या व्यक्ती कितीही धनवान असल्या तरीही सुज्ञ नागरिक यांना टाळणेच पसंत करतात. या व्यक्तींबद्दल आदराला स्थान नसते कारण आदरास ते पात्र नसतात.

चारित्र्यवान व्यक्ती सचोटी, वचनबद्धता, उत्तरदायित्व, देशप्रेम तसेच स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, धर्मनिरपेक्ष, मानवतावाद या मूल्यांचा स्वीकार करून असे आचरण करत असतात. अशा लोकांमुळेच covid चा प्रादुर्भाव वाढूनही समाजात एकीचे स्वरूप जे दिसते त्याला एकमेव कारण हेच आहे.

©श्रीकांत कुलांगे

मानसोपचार तज्ज्ञ.

9890420209

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *