काळजी आणि आपण

समीराला प्रश्न होता, वेड कशामुळे लागते? सगळी उत्तरे कोणालाच माहिती नाहीत; पण अशी शक्यता आहे की अनेक केसेसमध्ये भय आणि काळजी हे महत्त्वाची भूमिका निभावतात. चिंताक्रांत आणि जेरीस आलेली व्यक्ती या दुष्ट जगाबरोबर सामना करू शकत नाही. तिचे वास्तवाचे भान सुटते व सभोवतालच्या परिस्थितीची तिला जाणीव राहत नाही. त्यामुळे स्वत:च निर्माण केलेल्या स्वप्नांच्या दुनियेत ती जगते आणि कदाचित आपण यालाच वेड लागले आहे असे म्हणतो. 

म्हणून काळजी न करणं हे महत्वाचं आहे. काळजी केल्याने आपल्या शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतात याबाबत अनेक मानसशास्त्रज्ञांनी आणि डॉक्टरांनी काही तथ्ये सांगितली आहेत.

१. काळजी, वैफल्य, तिरस्कार, संताप, बंडखोरी व भय यामुळे आपल्या शरीराची व आपल्या मनाची धूळधाण होत असते.

२. काळजीमुळे चांगला धट्टाकट्टा मनुष्यसुद्धा आजारी पडू शकतो.

३. काळजी, भय, तिरस्कार यांसारख्या अप्रिय भावना शरीरातील कॅल्शिअमचे प्रमाण बिघडवतात आणि त्यामुळे दातांच्या समस्या उद्भवतात.

४. संधिवाताला कारणीभूत ठरणाऱ्या चार सामान्य गोष्टींची यादी केली आहे. अ) वैवाहिक आयुष्यातील अप्रिय घटना ब) आर्थिक संकट आणि दु:ख क) एकटेपणाची काळजी ड) सतत संताप, धगधगत राहणे. अर्थात याव्यतिरिक्त सुध्दा कारणे आहेत.

५. काळजी करणे थांबवले नाही, तर हृदयविकार, पोटदुखी किंवा डायबिटीस यांसारखी शारीरिक गुंतागुंत आणखी वाढेल. हे सगळे रोग म्हणजे एकमेकांची भावंडे आहेत;

६. काळजीमुळेच आपला चेहरा खराब होतो. काळजीमुळे इतर भावना गोठवल्या जातात. आपण आपला जबडा गच्च आवळून धरतो आणि मग चेहऱ्यावर सुरकुत्या येतात. कपाळावर आठ्या येतात.

७. केस पांढरे होतात. काही वेळेस तर केस गळून जातात.

८. आपल्या त्वचेचा पोत खराब होतो. त्वचेवर रेघोट्या उमटतात. मुरुमे येतात.

९. सतत वाटणारी काळजी माणसाच्या मेंदूवरील नियंत्रण घालवून टाकते व तो आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतो.

वरील लिस्ट तर अजून अपूर्ण आहे. समिराला, जेंव्हा या गोष्टींबाबत सांगितले तेंव्हा तिला आश्चर्य वाटले नाही कारण हे तिच्याबाबत अगदी तंतोतंत लागू होत होतं.

चिंतेबद्दलची काही मूलभूत तत्त्वे जाणून घेणं आवश्यक आहे. चिंता दूर ठेवायची असेल तर,

१. भूतकाळ आणि भविष्यकाळ लोखंडी दरवाजांनी बंद करा. दिवस बंदिस्त करा; म्हणजे फक्त आजचाच विचार करा.

२. जर मी माझी समस्या सोडवू शकलो नाही, तर जास्तीतजास्त वार्इट काय घडू शकते?’ हा प्रश्न स्वत:ला विचारने.

३. वाइटातली वार्इट गोष्ट गृहीत धरून ती स्वीकारण्याची मनाची तयारी करणे.

४. मनाने स्वीकारलेली वार्इट परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करणे.

५. हे सतत लक्षात असूद्या की, चिंता केल्याने तुम्ही तुमच्या आरोग्याची नासाडी करून फार मोठी किंमत चुकवत असता.

६. ज्या लोकांना काळजीशी संघर्ष कसा करायचा ते समजत नाही त्यांचा भर तारुण्यात वैचारिक मृत्यू होतो.

आपल्या अनेक ग्रंथांमधून हेच सांगितलेय, ‘सत्याला सामोरे जा : काळजी सोडा. मग तिच्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी काहीतरी करा!”

विश्रांती आणि मनोरंजन हा मंत्र आहे काळजी मुक्ततेचा. गात्रे शिथिल करणारे सगळ्यात उत्तम मनोरंजन म्हणजे – अध्यात्म, झोप, संगीत आणि हास्य! देवावर श्रद्धा ठेवा. गाढ झोप घ्यायला शिका. चांगल्या संगीतावर प्रेम करा. आयुष्याची गंमतशीर बाजू बघा; मग आरोग्य आणि आनंद तुमचेच आहे!

 

©श्रीकांत कुलांगे

9890420209

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *