पोचपावती

 

काल जबाबदारी न घेणाऱ्याबाबत लिहिलं आणि भरपूर प्रतिक्रिया आल्या कि समाजात जबादारीने काम करणारी पण खूप मंडळी आहे आणि त्यांच्या बाबतीत काय वाटतं. अगदी बरोबर, आमचे एक स्नेही आहेत यांनी त्यांच्या मामांचे उदाहरण दिले, आयुष्यभर खस्ता खाऊन त्यांनी आपल्या भावंडांचे मनापासून केले आणि शेवटी वयाच्या ५० व्या वर्षी शेवटचे कार्य संपवून म्हणाले कि वडिलांनी दिलेल्या जबाबदारीतून आज मुक्त झालो. त्यावेळी ते पन्नासचे जरी असले तरी ते ७० वर्षाचे वाटत होते. असे असंख्य उदाहरणे आपल्या घराघरातून दिसतील. अशा व्यक्तींची मानसिकता काय असते ते बऱ्याच जणांना ठाऊक असून सुद्धा कित्येकदा आपण त्यांच्या निस्वार्थत्यागाला किंमत देत नाही किंबहुना ती त्यांची ड्युटी होती म्हणून त्यांना कळत नकळत दुखावत असतो. आई वडील, भाऊ बहीण, जावई – सून, शेजारी पाजारी, डॉक्टर्स, नर्सेस, कोरोना योध्ये हे सुद्धा आपल्याला एकमेकांची काळजी घेताना दिसतात व दिलेल्या जबाबदाऱ्या सचोटीने निभावत असतात. एकत्र कुटुंब व्यवस्था तेंव्हाच सक्षम असते जेंव्हा त्यातील प्रत्येक व्यक्ती जबाबदारी ने आपले काम करते. अशा जबाबदार समाजासाठी आपण काय करावे यासाठी थोडे मंथन होणे आवश्यक वाटते.

सकारात्मक मानसशास्त्र संशोधनात, कृतज्ञता हि कायम आनंदाशी संबंधित असते असं सांगितलय. ज्यांनी आयुष्यभर स्वकीय व परकीय यांच्यासाठी आयुष्य वेचले, जबाबदारी ने काम केले त्यांच्या साठी आपण काय करू शकतो, ती म्हणजे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे. लोकांना अधिक सकारात्मक भावना जाणण्यास, चांगले अनुभव घेण्यास, त्यांचे आरोग्य सुधारण्यास, संकटांना सामोरे जाण्यास आणि मजबूत संबंध निर्माण करण्यास कृतज्ञता मदत करते.
जेंव्हा तुम्ही त्यांच्या कर्तव्याला सलाम करता तेंव्हा अशा जबाबदार व्यक्तींना काय वाटते ते पाहू:
१. त्यांचा आत्मसम्मान वाढतो.
२. अजुन जोमाने काम करण्याची इच्छा बळावते.
३. मी कुटुंबाचा, समाजाचा, देशाचा अविभाज्य घटक असल्याचा अभिमान वाटतो.
४. चुकीच्या मार्गाने जाण्याचा मोह नष्ट होतो.
५. इतरांना मार्गदर्शन करण्याची इच्छा बळावते.

समाजाला व आपल्याला मदत करणाऱ्यांचा आपण मनापासून आदर करायला हवा. तुमचा आदर त्यांना मोटिव्हेट करत असतो. म्हणून आपण नेहमी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आणि ती जर आपण नियमित केली तर “आपल्यात” काय फरक पडतात ते पाहू :

१. नेहमी आनंदी राहणार.
२. चांगली झोप येणार.
३. अधिक प्रेमाने वागणार आणि शक्यतो कुणाला दुखावणार नाहीत.
४. मजबूत प्रतिकारशक्ती निर्माण होते.
५. समाजात आदर वाढतो
६. इच्छाशक्ती वाढते.

जगभरामध्ये कृतज्ञता दिवस साजरा केला जातो, आपण दसऱ्याला गुरूंना दक्षिणा देतो, या पद्धती आहेत. परंतु ती अजुन सुंदर पद्धतीने जबाबदार व्यक्ती साठी व्यक्त करायची असल्यास :
१. सर्वात सोपा शब्द – धन्यवाद / थँक यु, प्रेमाने / आदराने म्हणा.
२. चरण स्पर्श किंवा आलिंगन.
३. समोरील व्यक्तीचे लक्षपूर्वक ऐका, त्यांना काहीतरी बोलायचे असते, मनमोकळे करायचे असते.
४. भेटायला जाताना, एखादा गुलदस्ता, काहीतरी छोटीशी भेटवस्तू, मिठाई – जे आवडेल / परवडेल ते घेऊन जा.
५. ज्या व्यक्तिला भेटायला जाताय ना, त्यांनाच वेळ द्या, विचारपूस करा, मोबाईल शक्यतो सायलेंट ठेवा.
६. नंतर त्यांना नियमित फोन करा / ई-मेल पाठवा.
७. त्यांना नक्की विचारा कि तुम्ही त्यांच्या करिता काय करू शकता.
८. जर हि जबाबदार व्यक्ती घरातील असेल तर – रोज पाया पडणे, त्यांची होईल ती सेवा करणे, त्यांचा चुकलं तर वाद न घालणे, त्यांच्या सूचनांचे पालन करणे योग्य.

जबाबदार मंडळी कशाचीही अपेक्षा न ठेवता काम करत असतात आणि म्हणून तुम्हाला प्रेमाने कोणी थँक यु म्हटले असेल तर त्यांना तुम्ही (जबाबदार व्यक्तींनी) कशी प्रतिक्रिया द्यावी :
१. छान पैकी हसून थँक यु म्हणा.
२. उगीचच आढेवेढे न घेता चूकभूल माफ करा.
३. त्यांनी तुमच्यासाठी वेळ दिला म्हणून त्यांना महत्व द्या.
४. समोरील व्यक्ती ऐकते म्हणून रामायण न सांगता आपले मनोगत, इच्छा थोडक्यात सांगा.
५. गरज असेल तर फोन करीन किंवा आठवण काढेन म्हणून जरूर सांगा.
६. “जबाबदार व्यक्ती” म्हणून आपण एकटेच नाही आहोत. रुबाब, मानपान न दाखवता हसतखेळत संवाद साधा.

आयुष्य हे खरंच सुंदर आहे. साध्या सोप्या भाषेतून, कृतीतून, डोळ्यातून आपण आपल्या साथीदाराला, आई वडिलांना, मित्रांना, सहकाऱ्यांना आनंदी ठेऊ शकता, त्यांचा आदर ठेऊन काम करू शकलात तर तुमचे आयुष्य अत्यंत समाधानी राहील व कुठल्याही डॉक्टरची, मानसोपचार तज्ज्ञाची गरज भासणार नाही.

@श्रीकांत कुलांगे
9890420209

3 thoughts on “पोचपावती”

  1. श्री….. अगदी खरे आहे … परंतु प्रत्यक्षात स्वकीयांकडुन च जबाबदार व्यक्तींची अवहेलना केली जाते… त्यांचा सर्वात मोठा गैरसमज हा असतो कि जबाबदार व्यक्ती ही सक्षम आणि आणि त्याने केले तर काय बिघडत. तसेच ज्याच्या साठी आपण करतो तोच नंतर म्हणतो की ” त्याने केले तर काय उपकार केले” ,
    या आणि अशाच बऱ्याच कारणांमुळे जबाबदार व्यक्ती दुखावली जाते ….???

  2. भानुदास वैद्य

    अतिशय सुंदर शब्दात आचरण कसे असावे याचे विवेचन केले आहे… प्रत्येकाने यातील प्रत्येक बाब आपल्या जीवनात अंगीकारली तर निश्चितच आपण अजात शत्रू होऊ… स्वतःबरोबरच आपल्या परिवारातील लहान सदस्यांनाही याची शिकवण देणे आवश्यक आहे… यातील काही गोष्टी मी करतो… पण काही होत नाहीत… त्याही अंगीकारण्याचा ह्या यापुढे निश्चितच प्रयत्न करिन… धन्यवाद श्रीकांत

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *