माणुसकी आणि नातं

माणुसकीचे दर्शन कधी कुठे होईल ते सांगता येत नाही परंतु हीच माणुसकी जी बाहेर दिसते तीच घरात सुद्धा दिसायला हवी. आपल्या वैवाहिक सहजीवनाचा अनुभव प्रत्येकाला वेगवेगळा असतो. एखादं भांडण जीवन उध्वस्त होण्यासाठी पुरेसं असते हे कित्येकांना माहिती असून सुध्दा आपल्या समाजात अशा घटना पुन्हा पुन्हा घडतात तेंव्हा समजदार माणसाची भूमिका कामी येते. भांडणं व्हायला वेगवेगळे कारणे असली तरी त्यातल्या त्यात मानसिक कारणे जास्त त्रासदायक असतात.जसे की

१. अविश्वास – मानसिक आजार असणाऱ्या व्यक्ती यामध्ये जास्त आढळून येतात. छोट्या गोष्टी त्यांना शंका घेण्यासाठी पुरेशा असतात.
२. दुसऱ्याचा राग घरातील व्यक्तींवर काढणे. राग, चीड, मनाची नकारात्मकता ही विकृत मानसिकतेचे प्रतीक असते.
३. शारीरिक व्याधीग्रस्त व्यक्ती विनाकारण अथवा लहान कारणास्तव आपल्या भावना चुकीच्या पद्धतीने मांडताना दिसतात.
४. स्वभाव – भांडखोर स्वभाव ही हिन वृत्ती असते. अशा व्यक्तींना लहानपणापसूनच बाळकडू घरातून, शेजाऱ्यांकडून, सभोवतालच्या वातावरणापासून शिकायला मिळाल्या मुळे पुढे तो एक सहज स्वभाव बनतो.
५. मी श्रेष्ठ हा हेतू – कौटुंबिक हिंसचाराच्या घटना यातून उदयाला येतात. पुरुषांना स्त्रिया त्रास देतात, किंवा पुरुष स्त्रियांना.

असे अनेक कारणे असली तरी आपण माणसे आहोत आणि इतरांच्या चुकांना शिक्षा देणे आपले काम नाही हा निसर्गाचा नियम पाळता येत नाही. निसर्ग प्रत्येकाच्या चुकांना इथेच शिक्षा देत असतो. मग हे भांडणं आई वडील, नवरा बायको, शेजारी, ऑफिस, कामाची जागा, विनाकारण कुठेही होतात. हे कसे थांबवले पाहिजे याबाबत आपण विचार करायला हवा. काय करू शकतो:

१. सासू-सून ; स्त्री ही कुणाचीतरी बहीण, मुलगी, आई असते. त्यांना आदराने वागवणे व त्यांच्या चुका पदरात घेणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. घर तुम्हा दोघां शिवाय पूर्ण होत नसते.
२. सून व मुली: फुलासारखं जपलेलं असतं तुम्हाला. म्हणून इतरांना आदर व मान द्या, त्यांच्या भावना समजून घ्या. बोलण्याआधी दोन वेळा विचार करा की मी कुणाला दुखावणार तर नाही ना. शेवटीं समोरील व्यक्ती कुणाची तरी भाऊ, वडील, आई आहेत.
३. शारीरिक व्याधी डॉक्टरकडून तपासून घ्या.
४. मानसिक विकारांपासून चार हात दूर बरे. लोकं वेड्यात काढतील. त्यापेक्षा शहाणपण व समजूतदार वृत्ती, मनस्ताप कमी करतील.
५. स्वतःला व्यस्त ठेवा, काहीतरी काम करा, मदत करा, समाजाला आपली गरज आहे.
६. शिक्षण आपल्याला बुध्दी आणि मन यांना काबूत ठेवण्यासाठी वापरायचे असते.
७. कुणालाही त्रास दिल्यास तुम्हालाही कुणीतरी सव्वाशेर भेटणार याची खात्री. तरुणांनी आपली ताकद देशासाठी वापरली तर छानच, बायकोवर नाही.

परस्पर संबंध आणि मानसिक संतुलन राखण्यासाठी एकमेकांबरोबर चांगले मित्र म्हणून राहिलो तर कोरोना सारख्या संकटात आपण बळी पडणार नाहीत. माणसात देव असतो हे वेळ आल्यानंतर समजते. परंतू ती वेळ न येवो म्हणून प्रार्थना मनापासून करा व माणूस बना.

© श्रीकांत कुलांगे
9890420209

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *